औरंगाबाद – राष्ट्रीय बजरंग दलाने गुरुवारी (ता.६) पोलिसांची परवानगी उडवून लावत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रभू श्रीरामाची आरती केली. त्यासोबतच टिपू सुलतान ब्रिगेडकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शिवसेनेसह हिंदुत्ववादी संघटना ६ डिसेंबर हा दिवस भगवा दिवस म्हणून साजरा करतात तर रझा अकादमीसह इतर संघटना हा काळ दिवस पाळतात. दुसरीकडे ६ डिसेंबर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. या सर्व पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी यासाठी दीड हजार पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. मात्र गुरुवारी सकाळी पोलिसांची परवानगी नसताना राष्ट्रीय बजरंग दल आणि टिपू सुलतान ब्रिगेडकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली.
राष्ट्रीय बजरंग दलाने केली श्रीरामाची आरती
अंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल यांच्या वतीने गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रभू श्रीरामाची प्रतिमा खुर्चीवर ठेवून आरती करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष सुभाष मोकरिया आणि अंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे महाराष्ट्र क्षेत्रीय समन्वयक हेमंत त्रिवेदी उपस्थित होते. अयोध्येतील रामजन्मभूमी येथे राममंदिर उभे करण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा यासाठी राष्ट्रीय बजरंग दलाचे हे आंदोलन होते. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना मागणीचे निवेदन दिले.
टिपू सुलतान ब्रिगेडचे धरणे
६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत बाबरी मशिद पाडण्यात आली होती. हा दिवस मुस्लिम संघटना काळा दिवस म्हणून पाळतात. टिपू सुलतान ब्रिगेड या संघटनेने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देऊन बाबरी संदर्भात न्यायाची मागणी केली.












